Tuesday 14 May 2013

घटस्फोटाची गोष्ट


 ॥ श्री ॥ 

नमस्कार मित्रहो !

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे दुपारी जेवण झाल कि सुस्ती यायला लागते. वाटत घरी जाव अन मस्त झोप काढावी. पण ऑफिसला फक्त शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे असले विचार डोक्यात येवूनही उपयोग नाही.     

आजही तसच झाल. दुपारच्या वेळी संगणकावर एका कुंडलीचा अभ्यास करत होतो. स्क्रिनकडे एकटक बघून बघून डोळे तारवटायला लागले होते पण कुंडली सुटत नसल्यामुळे कामही थांबवता येत नव्हत. पेंग यायला लागली तस उठलो ते तडक अन्सारच्या हॉटेलात. म्हंटल चहाही घेण होईल, सुस्तीही जाईल आणि पायही मोकळे होतील.

चहा घेत असतांनाच फोन आला "गुरुजी नमस्कार ! मी अमुक अमुक  …………. "

म्हंटल "बोला … बोला " मला काहीजण गुरुजी म्हणतात तर काही लोक सर म्हणतात.

"मुलाची कुंडली मेल केलीय. आमच्या मुलीची कुंडली तुमच्याकडे आहेच तर तेव्हढ जमत का बघा "

"ओके ! बघतो. पण तुमच्या मुलीची कोर्टात केस चालू होती त्याच काय झाल ? घटस्फोट मिळाला का ?"  

"हो .. हो .. मिळाला "

"ठीक आहे " अस म्हणत मी उरलेला चहा संपवला पण लगेच न उठता पाचेक मिनिटे डोळ्यांना विश्रांती म्हणून उगाचच दूर पाहत बसलो. (डोळ्यांचे डॉक्टर सांगतात दर वीस मिनिटांनी डोळ्यांना आराम दया.. दूरवर बघा, हिरवळीकडे किंवा हिरवे निसर्गचित्र बघा ..वगैरे  )

ऑफिसला येताच आधी त्या मुलीची कुंडली उघडली ..... 

२०११ ला या मुलीच्या घरच्यांनी मला तिची कुंडली दाखवली होती. त्यावेळी मी कुंडलीची दशा बघून सांगितलं  होत कि कुंडलीत वैवाहिक सौख्य अल्प आहे, त्रासदायक आहे, काळजी घ्या. कदाचित घटस्फोट होऊ शकतो.

यावर त्यावेळी तिच्या घरच्यांनी जी माहिती दिली होती ती अशी ….

मुलीच उच्च शिक्षण  झालं. योग्यवेळ येताच तीच लग्न झाल आणि दोनच महिन्यात मुलगी घरी आली ती पुन्हा कधीही सासरी न जाण्यासाठीच.   

काय घडल असेल ? अभ्यासकांसाठी कुंडली बाजूला देत आहे. तसेच कोर्स च्या विध्यार्थ्यानी सुद्धा या कुंडली चा अभ्यास करावा.

जातकास सध्या राहू दशा आहे ती २०२० पर्यंत.

राहू षष्ठात, बुधाच्या दृष्टीत, बुध ;लग्नात, अष्ठमेश व लाभेश, बुध शनीच्या नक्षत्रात, शनि व्ययात, तृतीयेश व चतुर्थेश तसेच राहू रवीच्या नक्षत्रात, रवि व्ययात व दशमेश, राहू शुक्राच्या राशीत, शुक्र लग्नात, सप्तमेश व व्ययेश, शुक्र केतूच्या नक्षत्रात केतू व्ययात.           


राहू दशास्वामी कुठल्याही प्रतीने वैवाहिक सौख्याचा बलवान कार्येश होत  नसून वैवाहिक सौख्य संपविण्याचाच बलवान कार्येश झाला आहे. 

दशा कालावधी संपायला तब्बल नऊ ते दहा वर्ष बाकी. हा कालावधी वैवाहिक सौख्यास वाईटच जाणार. दुसर लग्न करा किंवा तिसर करा…. काही फरक पडणार नाही फक्त दगडापेक्षा वीट मऊ अस होईल. 

या कुंडलीचा सप्तमाचा सब लॉर्ड बुध ;लग्नात वृश्चिक राशीत, शनीच्या नक्षत्रात व शनि व्ययात तूळ राशीत त्यामुळे जोडीदार हा शरीर सौख्याची इच्छा असली तरी उपभोग न घेऊ शकणारा, अतृप्त किंवा नपुंसक मिळतो. आणि याच कारणामुळे मुलगी दोन महिन्यातच घरी आली…. ती कायमची …पुन्हा कधीही  न जाण्यासाठी.  

दशा स्वामी राहू ३, ८, ११ व  १२   चा कार्येश असल्यामुळे घटस्फोट झाला.

आता दुस-या लग्नासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात झाली आहे. मग दुसरा विवाह होईल का ? … तर नक्की होणार कारण सप्तमाचा सब लॉर्ड बुधच आहे शिवाय  दशास्वामी दुस-या विवाहासाठी आवश्यक म्हणून लाभेश आहे त्याच बरोबर  अष्टम भावाचाही कार्येश आहे. त्यामुळे दुसरा विवाह होणार हे नक्की.

पहिला विवाह वरील कारणाने संपुष्ठात आला. ठीक आहे झाल गेल गंगेला मिळाल. पण या मुलीचा दुसरा विवाह सुद्धा संपुष्टात येणार आहे …… काय कारण असेल बर ..... तुम्हीच ओळखा … !

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब