Tuesday 7 August 2012

विवाह ...? कधीच नाही...



|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

माझे एक जातक एका वृद्ध व्यक्तीबरोबर कार्यालयात आले. नमस्कार वगैरे करून इतर जुजबी बोलण झाल्यावर त्या जातकाला विचारल.

"बोला..  कोणाची समस्या आहे?"

"यांच्या मुलीचा विवाह योग कधी आहे ते सांगा ." त्यान त्या वृद्धाकडे बोट करत म्हंटल.

"आज नाही सांगू शकत." मी त्यांना त्या वेळेस खरच वेळ देवू शकत नव्हतो.

"अस नका करू खूप अर्जंट आहे, तस नसत तर यांना मी घेवून नसतो आलो. मला एकट्यालाही येता  येत होत. पण आपल्या  भेटीची वेळ अगोदर न घेतल्यामुळेच  मी यांना घेवून आलो." वृद्धाने विनंती केल्यावर मग नाईलाज झाला, मी माझ्या हातातील काम बाजूला ठेवले.

"माफ करा,  पण  अस मधेच येणा-याला जर मी वेळ दिला तर आधीच्या जातकांच काम माग पडत. म्हणून मी नाही म्हणतो इतकच" मी माझी अडचण सांगितली.

"खर तर फोन करूनच येणार होतो पण तुमच्या बद्दल यांनी इतक सांगितलं कि मग वाट पाहण्याचा धीर धरवला नाही. कारण तुम्ही आठ, पंधरा दिवसा नंतरची वेळ दिली  असती व इतके दिवस   थांबण   मला आता शक्य नाही." वृद्धाने खर काय ते सांगितलं.

मी अधिक न बोलता त्यांच्या मुलीची भाव चलित कुंडली मांडली.

पत्रिका बाजूला दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

सध्या  जाताकास  गुरूची  महादशा सुरु असून ती २०१५ पर्यंत कार्येश आहे. गुरु तृतीयात, व्ययेश तसेच लग्नेश आहे. गुरु रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात, रवीची सिंह राशी लुप्त. गुरूची दृष्टी अष्टम, दशम व व्यय स्थानावर. म्हणजेच  गुरु हा ग्रह कुठल्याच प्रतीने विवाहाचा कार्येश नाही. त्या नंतर येणारी महादशा शनीची आहे ती २०३४ पर्यंत कार्यरत आहे. शनी षष्टात  व लग्नेश आहे तसेच  शनी  बुधाच्या नक्षत्रात, बुध व्ययात, षष्टेश  व अष्टमेश आहे. शनीची दृष्टी नवम , लग्न व चतुर्थावर आहे. त्यामुळे शनी सुद्धा विवाहाचा कुठल्याही प्रतीचा कार्येश होत नाही. 

सध्या मंगळाची अंतर्दशा सूरु आहे ती ऑगस्ट  २०१२ पर्यंत कार्येश आहे.  मंगळ  रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात. त्यामुळे हि अंतर्दाशाही काही कामाची नाही. पुढे येणारी अंतर्दशा राहूची आहे. राहू सुद्धा गुरूच्या दृष्टीत त्यामुळे हि अंतर्दशा सुद्धा विवाहासाठी पोषक नाही. हि अंतर्दशा २०१५ पर्यंत कार्येश आहे. त्यानंतर शनीची महादशा लागेल. शनी महादशेत तीन वर्ष शानिचीच अंतर्दशा राहील. तोपर्यंत २०१८ येईल. मग बुधाची अंतर्दशा लागेल.ती सप्टेबर २०२०  पर्यंत आहे. आता बुध कसा कार्येश होतो ते पाहू. बुध व्ययात, षष्टेश , अष्टमेश आहे तसेच बुध रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात. म्हणजे हि अंतर्दशाही लग्नासाठी उपयोगाची नाही. तोपर्यंत मुलीच वय ४३ होईल.

 वरील जंत्रीवरून एक लक्षात आल कि जातकाच्या तीनही महादशा विवाह घडवून आणण्यास पोषक नाहीत व एकही अंतर्दशा बलवान नाही.

आता मी सप्तम स्थानावर लक्ष केंद्रित केल. सप्तमात एकही ग्रह नाही. सप्तमाचा अधिपती चंद्र आहे. चंद्राच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही. चंद्राच्या उप नक्षत्रात फक्त केतू आहे. केतूची महादशा २०५१ नंतर सुरु होईल. त्यावेळी मुलीच वय ७४ असेल म्हणजे विषयच संपला. मग केतूच्या अंतर्दशेत विवाह होईल का. ?

केतूची अंतर्दशा २०१५ नंतर सुरु होईल. मग मी केतू कसा कार्येश होतो ते पाहिलं.

केतू द्वितीयात, केतू मंगल व शनीच्या दृष्टीत, म्हणजेच केतू हा सप्तमाचा अगदीच मजबूत कार्येश होत नाही. त्यामुळे या दशेतही लग्न होणार नाही.  जर  केतू दशाही  लग्नास  कारक  नाही  तर  मग याचा  अर्थ  अगदी  स्पष्ट  आहे. लग्न  होणार नाही.

मी गंभीर झालो. आता हि गोष्ट त्या वृद्ध पित्याला सांगण मला खूप जड गेल.

मी त्यांना सांगितलं. "मुलीच्या पत्रिकेत विवाह योग नाही."

"काय???" त्यांना  एकदम धक्काच बसला.

"होय,  पण तुम्ही प्रयत्न करू शकता, देव करो न माझ भविष्य चुको" मी त्यांना थोडा धीर देत म्हणाला. शेवटी काय तर डॉक्टर हि अगदी शेवटच्या वेळेस रुग्णाच्या नातेवाईकांना  असच सांगतात , अब  दवा कि नही दुवा कि जरुरत हैं.

थोडावेळ सुन्न अवस्थेत गेला. नंतर ती व्यक्ती सावरली. अन म्हणाली "गेल्या दहा  वर्षांपासून मी मुलीच्या लग्नासाठी  प्रयत्न करतोय. सगळ्यांनीच मला सांगितलं कि या वर्षी लग्न होईल. पुढच्या वर्षी होईल पण नाही झाल  हो. अस का ?"

या काच उत्तर मला माहित आहे. पण मी त्यांना ते समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही........

"प्रेम विवाह, अंतर जातीय अस काही आहे का? कारण ती कॉलेज ला प्रोफेसर  आहे   म्हणून   म्हंटल  " त्यांनी अंधुक आशेन विचारल.

"नाही. विवाहाचा  योगच नाही" मी जास्त खुलासा न करत सांगितलं. 

"याला काही उपाय ?" त्यांनी पुन्हा विचारल.

नाही. याला काही उपाय नाही. आडात नसेल तर पोहो-यात कुठून येणार. उपाय तेंव्हाच फलित होतात जेंव्हा त्या विषयाबद्दल काहीतरी  स्पार्क असेल. अन्यथा सर्व उपाय निरुपयोगी ठरतात.

"ठीक आहे. दैवाच्या मनात जे असेल ते होईल" अस म्हणत ते उठले. ....

शुभं भवतु !


आपला
नानासाहेब

No comments: